*❃❝ अहंकार ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
अहंकार आणि अहंकार्याचे पतन निश्चितच होत असते. आपली शक्ती योग्य कार्याला लावल्यास जीवनाचे सार्थक होत असते.
No comments:
Post a Comment