"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 321

   *❒ ♦तानाजी मालुसरे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     शिवरायांचे मावळे तानाजी मालुसरे
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता,या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. रायगड जिल्ह्यातील उमरठ (पोलादपुरजवळ) गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय. तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजींनी,आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला. कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या रात्री  राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला,याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. कोंढाणा इ.स.४ फेब्रुवारी,१६७० रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.

   जासूस दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं, तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें.उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला. असें सांगितलें. गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,एक गड घेतला,परंतू एक गड गेला! असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले. कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी गड आला पण सिंह गेला असे उद् गार काढले. त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले, ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले,तो मार्ग मढेघाट या नावाने ओळखला जातो. आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता. 

No comments:

Post a Comment