━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका विख्यात संताला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला,’’ तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात.’’ संताने म्हटले,’’ महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्र्चित घेऊन जाईन, पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या.’’ राजा म्हणाला,’’ ठीक आहे.’’ दुस-या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला, राजाने कुटीच्या दारापाशी येताच संताच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर आत जागे असणा-या संतांनी विचारले की कोण आले आहे, राजाने सांगितले,’’ मी राजा आलो आहे’’ संतांनी सांगितले की उद्या या. राजाला विचित्र वाटले पण तो तेथून निघून गेला. दुस-या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला, त्याने हाक मारली, संतांनी तोच प्रश्र्न विचारला, राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले,’’ मी आलो आहे’’ संतांनी सांगितले, उद्या या. तिसरे दिवशी राजा पुन्हा गेला, दोन दिवसांप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले, ‘’मी आहे’’ संतानी पुन्हा उद्या या असे सुनावले. राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काहीही उत्तर दिले हाकलून देतात, त्यापेक्षा न जाणेच बरे या विचारात होता. मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, आता चौथ्या दिवशी जाऊन बघु. चौथ्या दिवशी पण राजा गेला, त्याने संतांच्या नावाने हाक मारली, संतांनी आतूनच विचारले, कोण आहे, मात्र यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले, त्यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, ‘’राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात, पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही ‘मी’ आलो असे उदगार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलावले होते.तूम्ही तुमच्या "मी"पणाला बरोबर घेऊन आलात.मानवी जीवनात या "मी"पणाला काहिही स्थान नाही."मी" पणा सोडला की खूप काही शिकावयास मिळते.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* मानवाने "मी"पणा सोडल्यास खूप काही प्राप्त होते."मी"पणाचा मृत्यू ज्या दिवशी मानवातून होतो,तो त्या दिवशी संतत्वाकडे वाटचाल करु लागतो.
No comments:
Post a Comment