*❒ वामन गोपाळ जोशी ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १८ मार्च १८८१●मृत्यू :~ ३ जून, १९५६
★ वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी ★
हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, कवी, लेखक व मराठी नाटककार, त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत.
हे मूळचे समशेरपूरचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर, १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी हे एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, इ.स. १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या जंगल सत्याग्रहात अग्रभागी राहिले. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेशसेवेसाठी त्यांना ४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे शासनाला परत केले होते.
त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते.
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.
No comments:
Post a Comment