"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 257

   *❒ विजय तेंडुलकर ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ६ जानेवारी, १९२८
●मृत्यू :~ १९ मे, २००८

प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक

                              ■ श्री. विजय धोंडोपंत तेंडुलकर ■

    या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय नाटककारांपैकी एक. अनेकांच्या मते सर्वोत्कृष्टच. २७ नाटकं, २५ एकांकिका, अनेक पटकथा, अनुवाद, ललित लेख, कथा आणि दोन कादंबर्‍या एवढं लिखाण. 'तें' असा शिक्का उमटलेलं हे लिखाण बरेचदा गाजलं ते स्फोटक विषय आणि  हाताळणीमुळे. पण हे लिखाण इतकं अस्सल की त्यामुळे हादरलेला समाज स्वतःलाच अनेक प्रश्न विचारता  झाला.

     तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणि मुंबईत त्यांचे वास्तव्य होते. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते.
'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्नन दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्या  विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले.
"देशातील वाढता हिंसाचार" या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्याट संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. *मा.विजय तेंडुलकर* यांचे १९ मे २००८ रोजी निधन झाले. .

No comments:

Post a Comment