*❒ ♦मुहंमद पैगंबर♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
(९ रबीउल अव्वल हिजरी पूर्व ५३ - १२ रबीउल अव्वल हिजरी ११)
■ मुहम्मद पैगंबर ■
हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते.जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.```
◆ प्रारंभिक जीवन ◆
मुहम्मद पैगंबर यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला. त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने महंमद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.
◆ कुराणाचे अवतरण ◆
हिरा' ही गुहा जिथे मुहम्मद पैगंबरांना जिब्राईल या देवदूताने प्रथम संदेश दिला. महंमद यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". महंमदांनी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसर्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसर्यांदा देवदूत म्हणाला...
वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. महंमदना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. काही पाश्चात्त्य इतिहासकारांच्या मते महंमदना अपस्माराचा आजार होता व त्या झटक्यांमध्ये त्यांना ईश्वरी संदेश प्राप्त होत असे.
मुहम्मद पैगंबर यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला.
◆ विरोधाची वर्षे ◆
मुहम्मद पैगंबर मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. महंमद यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने महंमदांच्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने महंमद यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे काका अबू तालिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्नी खदिजा यांचेही निधन झाले.
मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने महंमद यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले.
◆ मदिनेकडे प्रस्थान ◆
वयाच्या ५३व्या वर्षी महंमद यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा बेत केला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण महंमदांना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देवून ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
महंमदांच्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरूवात झाली.
◆ विरोधकांशी युद्ध व तह ◆
मदिनेस पोहचल्यानंतर महंमद पगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. महंमद यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. महंमदांच्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये महंमदांनी विरोधकांचा पराभव केला.
या लढायांतील विजयानंतर महंमदांनी आपल्या १४०० सहकार्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. मोहम्मदांनी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये महंमद आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की महंमदांनी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला.
मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही महंमदांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.```
◆ मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा ◆
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये मोहम्मद (सलललाहु अलैहिव सल्लम )पैगंबरांनी १०,००० सहकार्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात महंमद(सलललाहु अलैहिव सल्लम ) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले.
सन १० हिजरी मध्ये महंमदांनी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले...
"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."
याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.
◆ मृत्यू ◆
शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे") हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले.
◆ प्रभाव ◆
महंमद यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.
पण याहीपेक्षा महंमदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वपुर्ण ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. महंमदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपुर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.
आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर महंमद पगंबर यांचा प्रभाव निःसंशय आहे.
No comments:
Post a Comment