*❒ नामदेव लक्ष्मण ढसाळ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १५ फेब्रुवारी १९४९, जि.पुणे,महाराष्ट्र●मृत्यू :~ १५ जानेवारी २०१४, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई
◆कार्यक्षेत्र :~ कवी, लेखक, समाजसुधारक,
◆साहित्य प्रकार :~ विद्रोही कविता
◆प्रसिद्ध साहित्यकृती :~ गोलपिठा,
◆पुरस्कार :~ पद्मश्री
■ नामदेव लक्ष्मण ढसाळ ■
हे मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयांवरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली.
१९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला, व त्यानंतर आणखी कवितासंग्रह. 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' हा माओइस्ट विचारांवर आधारित, तर 'प्रियदर्शिनी' हा (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तर 'खेळ' हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.
★दलित चळवळीचे प्रमुख शिलेदार★
साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक प्रमुख शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या 'दलित पँथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरिरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथर'शी ढसाळ यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते.
नामदेव ढसाळ हे १९६० नंतरच्या मराठी कवींमधले एक प्रतिभाशाली कवी होते. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिकदृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. आंबेडकरी चळवळीशी, विशेषत: दलित चळवळीशी त्यांची बांधिलकी होती. त्यांच्या लिखाणावर लघुनियतकालिकांचा, मनोहर ओक यांचा तर काही प्रमाणात दिलीप चित्र्यांचा प्रभाव दिसतो.
नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. अलीकडे त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. त्यांच्या प्रकृतीत सतत दोन महिने सातत्याने चढउतार होत होते. सोमवारी-जानेवारी १३.इ.स.२०१४ या दिवशी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
नामदेव ढसाळ यांचे बुधवार,१५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार,१६ जानेवारी २०१४ सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्या ढसाळांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment