"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, March 30, 2019

वॉटसपचा वापर


      हातात नुसता स्मार्टफोन असून उपयोग नाही. खऱ्या अर्थाने " स्मार्ट " व्हा..
  पत्रकार उदय पाठक यानी टाकलेली ही पोस्ट प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. अवश्य वाचा...

------ ⏮  वॉटसपचा वापर  ⏭------

   ववाट्सअप वर अनेक नवनवे समूह बनतात. अनेक समूहात तेच तेच लोक सगळीकडे सामाईक असतात. त्यामुळे मजकूरही तोच तोच वाचावा लागतो. वॅाट्सअपचा नेमका वापर कसा करावा, याबाबतीत मात्र बहुतांशी लोक गोंधळलेले दिसतात. सगळ्यांनी मोबाईलवर टाकलंय म्हणून आपणही वॅाट्सअप घेतलेलं असतं. एकदा नंबर लोकांकडे गेला की धडाधड संदेश यायला सुरुवात होऊन, आपण त्या चक्रव्युहात कधी गुरफटून जातो, आपलं आपल्यालाच कळत नाही. त्याचं कारण एकच. गंतव्य स्थान निश्चित असल्याशिवाय गाडीत बसायचं नसतं किंवा गाडी सुरु करायची नसते. जायचं कुठे, निश्चित नसेल तर गाडी गोल गोल फिरत राहते, पेट्रोल जाळत, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय...


    ज्यांना काहीच सुचत नाही, ते सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे, गुड मॉर्निंग, गुड नाईट चा स्वीकारतात. मधल्या काळात काय करायचं म्हणून इतरांचा आलेला मजकूर कॉपी-पेस्ट, शेअर, फॅारवर्ड करतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट वैयक्तिकरित्या करा, पण समूहात अजिबात नको. यामुळे इतरांना काय मनस्ताप होतो, याची जाणीव कोणी ठेवत नाही. अनेक चांगले लोक या प्रकारांना कंटाळून समूह सोडणे पसंत करतात. शिवाय, असले फुटकळ संदेश पाठवणारे लोकच अफवा पसरवणाऱ्या प्रवृत्तीचा "गिऱ्हाईक" बनतात. 

    जगात विकृत माणसांची कमी नाही. आयुष्यात चांगलं काही करायचंच नाही, आणि वाईटाचा शक्यतोवर प्रचार प्रसार करत राहायचा, या एकाच ध्येयाने ही माणसं झपाटलेली असतात. बरे हल्ली सुसंस्कृत आणि विकृतांची अशी काय सरमिसळ झाली आहे की जे पसरत आहे किंवा पसरवलं जात आहे, त्याची शहानिशा करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नाही. सध्याच्या पैसा कमावण्याच्या नादात कोणाला तितका वेळही नाही. 

      पैसा आहे म्हणून हातात स्मार्ट फोन आहे. पण म्हणून व्यक्ती स्मार्ट असेलच, याची शाश्वती नसते. बघा ना, वॅाट्सअप वर ज्या पद्धतीने बुद्धिवादी म्हणवणारे लोकही आंधळेपणाने खोट्याचा प्रचार करतात, तेंव्हा त्यांच्या स्मार्टपणाची खरोखर कीव करावीशी वाटते. 

     आयुष्य लहान आहे, ही सुरेश भटांची नसलेली कविता बिनधास्त त्यांच्या नावावर खपवली जाते. 

    खबरदारीचे इशारे बिनधास्त एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव टाकून पोस्ट केले जातात. आपल्याकडे जी कोणतीही पोस्ट येईल, त्यात असलेल्या नंबरवर कॉल करण्याची सवय लावा. पोस्ट खरी असेल, तरच पुढे पाठवा. पोस्ट खोटी असेल, तर तसे स्पष्ट करणारी नवी पोस्ट तयार करून टाका.

     मंगळ हा ग्रह आहे, तो तारा नाही, तिथून किरणोत्सर्ग होऊ शकत नाही, हे माहित असतानाही त्यावरच्या कॉस्मिक किरणांनी पृथ्वीवर दुष्परिणाम होणार असल्याचं भय पसरवलं जातं. अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही पोस्ट येतील, त्यातील शब्द वापरून इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला सत्य काय ते कळेल. www.hoax.com वर तुम्हाला जगभरात चाललेल्या खोट्या पोस्टची माहिती मिळते. त्यांचा खरा खुलासा कळतो. आपल्याला एक कळतं की, जे आज आपण मोठ्या कौतुकाने शेअर करतोय, ते जगात आठ दहा वर्षांपूर्वी खोटं ठरलंय. 

     भारताच्या राष्ट्रगीताला जगातलं सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून दर्जा मिळाल्याची आवई उठवली जाते. वास्तविक युनेस्कोच्या वेबसाईट वर लगेच जाऊन उलट तपासणी करणं शक्य असतं, पण आपण आपल्या नकली देशप्रेमापोटी नकळत आपल्याच राष्ट्रगीताचा अपमान करत असतो, हे आपण लक्षात घेत नाही. म्हणून नियमितपणे indian hoax जरूर तपासा. 

      जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकावण्यास मनाई असल्याचा कांगावा केला जातो. पण जर आपण जम्मू काश्मीर सरकारच्या वेबसाईटवर गेलो, तर चित्र वेगळं दिसतं. जाती धर्मात तेढ पसरवणाऱ्या अनेक पोस्ट वॅाट्सअपवर वेगाने फिरत असतात. अशा पोस्ट खऱ्या असो वा खोट्या, ताबडतोब डिलिट करा. मुलामुलींना किंवा कोणालाही मारहाण करतानाचे व्हिडियो, कोणाचीही वैयक्तिक विशेषतः स्त्रियांची बदनामी करणारे व्हिडियो असतील, पोलिसांना कळवा, अन्यथा डिलिट करा. 

    केंद्र सरकारने महिला अत्याचाराच्या कायद्यातील ज्या कलमात सुधारणा करून महिलांना हल्ल्यावेळी समोरच्याचा खून करण्याची परवानगी दिली म्हणून सांगितलं जातं, ते कलम नकली नाणे बनविण्याबाबत आहे. पण आपण आंधळेपणाने तो धादांत खोटा मजकूर आणखी शंभर लोकांना पाठवतो. ही सवय आजच सोडा. 

     कधी शीतपेयांमध्ये एड्सबाधित माणसाचं रक्त मिसळलं असल्याचा खोटा प्रचार केला जातो. इबोलावर मीठ पाण्याचा उपचार चालतो, म्हणून खोटं पसरवलं जातं. कडक लिंबांच्या किसाचा उपचार डॉ. आमटेंसारख्या समाजसुधारकांच्या नावावर खोटा खपवला जातो. देशाच्या उपराष्ट्रपतींच्या देशभक्तीबाबत संशय निर्माण करून त्यांची अर्वाच्य भाषेत बदनामी केली जाते. देशाचे पंतप्रधान, अनेक राजकीय नेत्यांची खालच्या स्तराचे विनोद करून खिल्ली उडवली जाते. ही एक विकृती आहे. तिची सवय लावून घेऊ नका. 

    काय मिळत असेल, या लोकांना असं    खोटंनाटं पसरवून असा भाबडा प्रश्न आपल्या मनात येत असेल. पण त्याचं उत्तर त्या भाबडेपणातच आहे. आपलं खोटं या देशातले लोक किती बेफिकीरीने पुढे पुढे ढकलताहेत, हे पाहून जगातली संबंधित विकृत माणसं पोट धरून हसत असतील, आपल्या मूर्खपणावर किंवा अति शहाणपणावर!!! 

     त्या विकृतांना असुरी आनंद सुद्धा होत असेल. कारण आपण दिवसेंदिवस बधीर होत चाललो आहोत, याची त्यांना जाणीव आहे. एक दिवस आपणच आपल्या बेजबाबदार पणामुळे आपलीच घरेदारे पेटवण्यास कारणीभूत ठरणार आहोत. आपली नजरचुकीने पुढे पाठवलेली पोस्ट एक दिवस दंगेधोपे घडविण्यास कारणीभूत ठरू शकते. ती आपणावर कायदेशीर कारवाई होण्याचे कारण तर ठरेलच पण आपल्याच प्रियजणांच्या विनाशाचेही कारण बनू शकते. 

    आपले डोळे उघडतील. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. तेंव्हा, वेळीच जागे व्हा. 

     स्वतःची आणि स्वतःचीच, पुरेपूर खात्री असल्याशिवाय कोणतीही पोस्ट शेअर किंवा फाॅरवर्ड करू नका. 

     कोणतीही कविता, लेख, विचार ज्याचे असतील, त्याचे नाव टाकल्याशिवाय पोस्ट करू नका. 

संवेदनशील विषय पोस्ट करण्याचे किंवा शेअर करण्याचे टाळा. 

कोणाही व्यक्तीची, समाजाची, धर्माची तारतम्य सोडून बदनामी करेल असे किंवा फुकाचे उदोउदो करेल असे मजकूर, फोटो, चित्रे, कार्टून्स, विनोद पोस्ट करू नका. 

महिलांना अवमानित करणारे विनोद, पोस्ट टाळा.

रक्तरंजित किंवा भावना भडकवणारे फोटो पोस्ट करू नका. 

ग्रुपवर आपसात बोलतानाही आपलं लिखाण ग्रुपमधील सर्व सदस्य वाचत असतात, याचे भान राखा. ते समूहाचा विचार सोडून नसावं, याची काळजी घ्या. 

देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अशी माहिती घाईघाईने उघड करू नका.

हे सोशल नेट्वर्किंग आहे, कचरा डेपो नाही, याची जाणीव असू द्या. सोशल नेट्वर्किंगचा वापर सकारात्मक करा. 

      हातात नुसता स्मार्टफोन असून उपयोग नाही. खऱ्या अर्थाने " स्मार्ट " व्हा..

                            ~ पत्रकार उदय पाठक

No comments:

Post a Comment